Friday, September 22, 2017

प्रार्थना

लहानपण, शाळा आणि प्रार्थना यांचा आठवणींच्या राज्यात खूप जवळचा संबंध आहे. अजूनही प्रार्थना म्हणलं की 'खरा तो एकची धर्म' ही शाळेत म्हणत असलेली प्रार्थनाच चटकन ओठांवर येते. शाळा संपली असली तरी सुद्धा सिनेमा आणि इतर अल्बम मधून अधून मधून प्रार्थना कम गाणी तर ऐकायला मिळत असतातच. पण लक्षात राहतील, आपलेसे वाटतील असे शब्द, आपल्याला सहज गुणगुणता येईल अशी चाल असलेली नवीनच प्रार्थना खूप वर्षांनी ऐकायला मिळाली.

काही वर्षांपूर्वी 'नितळ' नावाच्या सिनेमा मध्ये पण अशीच एक कुणालाही गुणगुणता येईल आणि सोप्या शब्दात गहिरा अर्थ असलेली एक प्रार्थना ऐकली होती. बहुधा गंभीर विषयामुळे खूप कमी लोकांपर्यंत हा चित्रपट पोहोचला असावा. 


मध्यंतरी डॉ. प्रकाश बाबा आमटे या चित्रपटातली प्रार्थना ' तू बुद्धी दे' खूप आवडली होती. का कोण जाणो, पण ती ऐकतानाही स्वतः गुणगुणावी अशी नाही वाटली. कदाचित आमटे कुटुंबियांइतक्या थोर लोकांनी केलेल्या त्यागाला, त्यांनी समाजोपयोगी कामाला वाहून घेतलेल्या आयुष्याला आपल्यापुढे ठेवणाऱ्या प्रसंगांच्या सोबतीने ती प्रार्थना चित्रपटातून आपल्यासमोर असल्याने ती म्हणण्याची लायकी पण आपली नाही अशी पण भावना कुठेतरी निर्माण झाली असावी नकळत मनात. 

मात्र बऱ्याच दिवसांनी 'उबुंटू' च्या निमित्ताने नितांतसुंदर साध्या चालीत बांधलेली पण अतिशय प्रभावी, अर्थपूर्ण गेय शब्द असलेली 'हीच अमुची प्रार्थना' ऐकायला मिळाली. विशेषतः शाळा, गुरुजी आणि शाळेतले विद्यार्थी यांच्या सोबतीने ती पडद्यावरती येत असल्यामुळेही असेल, पण खूपच छान वाटली. गाण्याच्या चित्रीकरणातल्या फ्रेम्स, प्रकाशछटा पण मला आवडल्या.


'भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी
सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्री
तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे...' हे त्यातले शब्द मला खूपच भावले.

ही प्रार्थना ऐकताना, सोबतीने गुणगुणताना मला चित्त शांत होण्याबरोबरच जमिनीशी जोडल्याचा ( म्हणजे मला earthly feeling, feeling surrendered इ. इ. अर्थाच काहीतरी म्हणायचय पण नेमके शब्द सापडत नाहीयेत. समझनेवालो को इशारा काफी है! 😊) असा अनुभव आला. असं खूप कमी वेळेला होतं की त्या चालीत, त्या गाण्यात अपेक्षित असलेला भाव प्रेक्षक म्हणून माझ्याही मनात पण तेव्हढ्याच परिणामकारकरित्या दाटून आलाय. अन्यथा बहुतांशी तटस्थ दृष्टिकोनातूनच गाण ऐकलं जातं.

असो, तर खूप दिवसांनी अशी मस्त प्रार्थना सापडल्यामुळे मी खूष आहे. हिचं गाण म्हणून आयुष्य खूप असणार हे नक्की. निदान माझ्यासाठी तरी!

Tuesday, July 12, 2016

धुके दाटलेले उदास उदास

धुके दाटलेले उदास उदास
मला वेढिती हे तुझे सर्व भास

उभी मूक झाडे, विरागी किनारा
झुरे अंतरी अन्‌ फिरे आर्त वारा
कुणीही न येथे दिसे आसपास

कुठे चालल्या या दिशाहीन वाटा ?
कुणा शोधिती या उदासीन लाटा ?
दिशांतून दाटे तुझा एक ध्यास

क्षणी भास होतो तुझे सूर येती
जिवा भारुनी हे असे दूर नेती
स्मृती सोबतीला असा हा प्रवास
- मंगेश पाडगावकर

दोन महिने उलटून गेलेत, मी तिचा आवाज ऐकला नाहीये. तिच्या मांडीवर डोकं टेकवून, तिचा हात माझ्या डोक्यावर फिरून तर न जाणो किती महिने झालेत. 'जातस्य हि ध्रुवो मृत्यु' वगैरे सगळं ऐका-वाचायला ठीक आहे. पचवणं फार कठीण! आतापर्यंत वाचनात आलेल्या, शाळेत शिकलेल्या सगळ्या कविता आता अनुभवाची जोड घेऊन समोर येताहेत. फ. मुं च्या भाषेतली 'जन्माची शिदोरी' माझी ती, सरणार जरी नसली तरी उरली नसल्याची बोच घेऊन जगणं थोडं अवघड आहे खरं. असो!

P.S.: वरची पाडगावकरांची कविता मूळ वेगळ्या context मध्ये असली तरी मला वाचताना वेगळा अर्थ सापडला. चू.भू.दे.घे.

Saturday, October 10, 2015

उन्हाळा

सध्या इथे मेलबर्नला उन्हाळा सुरु झालाय. इथे खरं तर मी गेल्याच उन्हाळ्यात आले. पण भारतातून आल्या आल्या इथे उन्हाळ्याचं महत्त्व जाणवलं नाही. आपल्याकडे उन्हाची काय कमतरता?! पण इथला एक हिवाळा काढला आणि मग इथले सगळे लोक उन्हाची आणि उन्हाळ्याची इतकी आसुसून वाट का पाहतात ते चांगलंच समजलं.

आज बाहेर खूप छान वातावरण आहे. एक प्रसन्न संध्याकाळ. माझं मन संधी मिळेल तेव्हा भारताची सफर करून घेत असतंच. आजही वेगळं नाहीच.

दिवसभराच्या कडक उन्हानंतर सूर्य मावळतीला जाताना हलके हलके हवेत वाढणारा गारवा... तो संधिप्रकाश... कधी हलकी झुळूक तर कधी जोर धरलेला वारा... त्या हवेबरोबर नाकाला भिडणारा तो तप्त मातीचा गंध... हळूहळू गडद होत जाणारा अंधार... दिवेलागण... देवघरातली मंद तेवणारी समई आणि घरभर दरवळून राहिलेला उदबत्तीचा वास.

आठवणींचा फेर, आणखी काय!

Tuesday, May 19, 2015

एका वेदनेची अखेर

अरुणा शानभाग. खरं तर हे नाव माझ्या जास्त परिचयाचं असण्याचं काही कारण नाही. तिचं अस्तित्व माझ्यासाठी एका वर्तमानपत्रातल्या बातमीपुरतं मर्यादित आहे, किंवा आता होतं म्हणावं लागेल. तिच्या आयुष्यावर बेतलेली 'अरुणाज स्टोरी' मी वाचलेलं नाही. माझा जन्म झाला तेव्हा तिच्यावर बलात्कार होण्याच्या घटनेला एक तप उलटून गेलं होतं. आयुष्यातल्या ६५ वर्षांपैकी तब्बल ४२ वर्षे कोमा मध्ये गेलेल्या अरुणा ची मृत्यूने अखेर सुटका केली. तिचं जाणं मनाला चटका लावून तर गेलंच, पण त्याबरोबर कितीतरी प्रश्नांचं काहूर माझ्यापाशी ठेवून गेलं. स्वतः न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा किती भोगावी लागावी याला काही मर्यादा आहे? दयामरणाचा हक्क असणे बरोबर की चूक याबद्दल विचार करणारी मी कोण? पण रोज तीळ तीळ मरण्यापेक्षा, एकदाच काय ते मरण येऊन गेलेलं बरं का नाही? असा विचार नक्कीच मनात खुपत रहातो. आज तिच्या कायदेशीर मृत्यूची बातमी वाचताना 'मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते'  हे सुरेश भटांचे शब्द या परिस्थितीत किती चपखल बसतात हे जाणवत होतं.

ई सकाळ वर ही बातमी वाचताना सहज वरच्या कोपरयाकडे लक्ष गेलं. '41 likes and 314 dislikes'.
मी कुठे क्लिक करावं?  कुणाच्याही निधनाच्या बातमीला 'Like' कसं करणार म्हणून 'Dislike';  की एका तडफडत्या आत्म्याची अखेर सुटका झाल्याचं बरं वाटलं म्हणून  'Like'?

मला उत्तर अजून सापडलं नाहीये.



Tuesday, April 21, 2015

What I want to say...



As Deep rightly says, '...the most serious loss you suffer when you don't write regularly. You lose the ability to write'.  


I wish things will turn better some day. You know what I mean to say, right? :(

Tuesday, February 10, 2015

हे असं असतं होय!

बऱ्याचदा आपल्यासमोर आलेल्या गोष्टी आपण फारसा विचार न करता गृहीत धरतो. किंवा आपल्याला कोणीतरी सांगितली आहे म्हणजे तशीच असली पाहिजे असा विचार करून शांतपणे स्वीकारतो. बऱ्याच काळानंतर अचानकपणे साक्षात्कार होऊन त्या गोष्टीचा खरं अर्थ उमगतो किंवा ती गोष्ट खऱ्या स्वरुपात आपल्या समोर येते. रियालिटी आपल्या डोक्यातल्या फ्यांटसीजला छेदून जाते आणि एखादी गोष्ट नव्याने उमजते तेव्हा म्हणावसं वाटतं, ओहो.. हे असं असतं होय!

 शाळेत असताना निबंधलेखन हा एक अत्यंत कंटाळवाणा पण परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा भाग असायचा. विषयही फारसे वेगवेगळे नसायचे. 'विज्ञान शाप की वरदान' किंवा 'माझा आवडता लेखक' किंवा 'माझी आई' इत्यादी. पण निबंधलेखन हे आपल्या आजूबाजूच्या गोष्टी पाहून अनुभवून आपली विचार मते किंवा निरीक्षणे मांडण्याची गोष्ट आहे हे कोणीही सांगितलं नाही. बऱ्याचदा नवनीत चे गाईड्स आणि निबंधामालेसारखी (हातवळणे इ.इ.) रेफरन्स पुस्तके वाचून त्यातील छापील आराखड्यानुसार लिहिले जायचे.  माझी एक मैत्रीण नेहेमी म्हणते, की निबंधाच्या पुस्तकातली आई ही ऑफिसला जाणारी, मुलांचा गृहपाठ घेणारी अशी असते. त्यामुळे तिला नेहेमी असं वाटायचं की अशाच आई वरती निबंध लिहिणं अपेक्षित आहे. तिची आई लवकर उठून भाकऱ्या करणारी, शेतात जाणारी होती. तिच्याहीबद्दल लिहिता येऊ शकतं हे त्यावेळी कोणीतरी सांगायला तर हवं ना! शाळा सोडल्यानंतर बऱ्याच वर्षांनी हे कळलं की हे असं असतं तर!


परवा मी ALDI चं weekly offers booklet चाळत असताना मला एक गोष्ट दिसली. ' Hot Cross Buns' च चित्र होतं ते. त्यावरच्या डिस्काउंट ची माहिती दिली होती. शाळेत असताना 'hot cross buns, hot cross buns, one a penny, two a penny, hot cross buns' अशी एक कविता होती. त्यातले ते buns म्हणजे हेच (त्यावर खरंच क्रीम ने भरलेला क्रॉस असतो! असं असू शकेल असा विचार त्यावेळी कविता शिकताना अजिबात केला नव्हता). ते असे असतात/दिसतात हे आत्ता इतक्या वर्षानंतर समजलं तेव्हा खरच मजा वाटली. असा मी असामी मधल्या शंकऱ्या "म्हणजे तुम्ही मला डुक्कर म्हणता ते हे होय!" असं म्हणतो त्यातली गत :)

Wednesday, June 26, 2013

The countdown has already begun.

Monday, May 13, 2013

तसं पाहायला गेलं तर माणसाच्या आयुष्यात आठवणीत राहण्यासारखे अगणित असे प्रसंग घडत नाहीत. रोजच्या रोज नवीन अशा प्रसंगांना सामोरं जाणारा माणूस सापडायला विरळाच. त्यामुळे असे काही मोजके प्रसंग सतत स्मरून त्या आठवणीत हरवून जाण्याची माणसाची सवय अगदी जुनीच म्हणावी लागेल. अगदी आजी आजोबा नातवंडाना ज्या गोष्टी सांगतात त्या बहुधा त्याच त्याच असतात. अर्थातच तरीही त्यांची गोडी जराही कमी होत नाही ही गोष्ट अगदी खरी आहे.

आपल्या आठवणींच्या कप्प्यात जतन करून ठेवेलेले असे मोजकेच का होईना प्रसंग वारंवार आठवून त्यात हरवून जाण्याचा आपला स्वभाव असतो. मुळात अशा आयुष्यभर जतन करून ठेवण्यासारख्या गोष्टी तुमच्या कडे असल्या तर तुम्ही अतिशय भाग्यवान आहात यात तिळमात्र शंका नाही.


हे पाल्हाळ सांगण्याच कारण म्हणजे माझ्या अवतीभवती असलेल्या लोकांना सदैव मुदुमलाईच कौतुक ऐकून वैताग येतही असेल कदाचित, पण तरीही त्या आठवणींमध्ये रमून जाणे हा कदाचित माझा छंद होऊन बसला आहे. आठवणी थोड्याच आहेत. पण तरीही माझ्यासाठी अतिशय जिव्हाळ्याच्या आहेत.


पंधरा दिवसांपूर्वी मुदुमलाई सोडल्याला एक वर्ष होऊन गेलं. फार काही जास्त फिरलो अशातला भाग नाही, उलट आमचं घर, आमचं गाव, आणि गावाच्या वेशीपलीकडला फार तर फार एखादा किलोमीटर पर्यंतचा भाग इतकाच आमचा जास्तीतजास्त वावरण्याचा भाग होता. तरीही जवळपास तीन वर्षांच्या वास्तव्यात तिथला प्रत्येक ऋतु मनसोक्त अनुभवला, प्रत्येक दिवशीच्या सायं छटा नव्याने अनुभवल्या. (लोभी मन तरीही जास्त हावरटपणा करत जातं. ) आणि या आठवणींची झिंग अजूनही मनातून उतरली नाहीये.


आठवणींच्या एका पर्वाचा शेवट झाल्याला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या गोष्टी पुन्हा बोलून दाखवाव्याशा वाटल्या त्यानिमित्त हा लेखनप्रपंच!