Tuesday, June 29, 2010

त्यांच्या चष्म्यातून...

परवाचीच गोष्ट.
काही दिवसांपूर्वीच आम्ही नव्या घरात रहायला गेलोय. हे नवं घर आमच्या जुन्या घरापासून थोड्याशाच अंतरावर आहे. त्या भागात एक माकडांची टोळी सुद्धा राहते. रोज सकाळी सकाळी छपरावरती दणादण उड्या मारण्याच्या त्यांच्या सवयीची आम्ही हळूहळू सवय करून घेत आहोत. आम्ही इथे येण्यापूर्वी हे घर रिकामंच होतं. ही सगळी मंडळी त्या घरात कधीही जाऊनयेऊन असायची. त्यामुळे आम्ही गेल्यावर पहिले काही दिवस आम्ही त्यांच्यावर नजर ठेवून होतो आणि ते आमच्यावर!! आम्ही असल्यामुळे त्यांच्या अगदी घरातल्या अंगणात वगैरे येण्यावर बंधनं आली खरी... तर झालं काय, त्या टोळीतल एक माकड (अगाऊ कार्टं!) त्या दिवशी आलं होतं. मी अचानक त्याच्या समोर आल्यामुळे ते दचकलं आणि मी सुद्धा थोडी टरकलेच... तसं जाळीचे दार असल्यामुळे काही काळजी नव्हती. तर आता मी होते जाळीच्या एका बाजूला घरात आणि ते होतं बाहेर. म्हणजे उलटी परिस्थिती- मी जणू पिंजर्‍यात होते आणि माकड मला पिंजर्‍याच्या बाहेरून न्याहाळत होतं. दोन मिनिटं आम्ही दोघेही एकमेकांकडे डोळे वटारून पहात होतो. दोघेही एकमेकांचा अंदाज घेत होतो. दोघांनाही माहीत नव्हतं की समोरचा प्राणी नक्की काय विचार करतोय. आपल्याला घाबरलाय, की आपल्यावर हल्ला करण्याच्या बेतात आहे की पळून जाण्याच्या विचारात आहे. अशा बिकट परिस्थितीत बराच वेळ गेला. समोरचा काहीच करेना म्हणून शेवटी आम्ही दोघेही वैतागलो आणि आपापल्या कामाला निघून गेलो!
मागच्या आठवड्यात आम्ही २० गव्यांचा कळप पहिला. २० गव्यांचे ४० डोळे आम्हाला आणि आम्हा ५-६ जणांचे १५-१६ (चष्म्याचे २-२ एक्स्ट्रा धरुन!) त्यांना बराच वेळ निरखत होते. शेवटी आम्हाला डॊळे भरून पाहून घेऊन कंटाळून ते आल्या वाटेने निघून गेले.

त्यावेळेपासून मी विचार करत होते की माणसं समोर आली की प्राणी काय विचार करत असतील?

माणसाला एकंदरीतच सगळ्याच गोष्टींबद्दल कुतुहल असतं. खरंच किती क्रेझी असतात लोक प्राणी बघण्यासाठी. जगाच्या कुठल्याकुठल्या कोपर्‍यात भटकतात. तहानभुकेची पर्वा न करता रानोमाळ हिंडतात..जीवाचा आटापिटा करतात. एव्हढं करुन मिळतं काय? एखाद्या प्राण्याची निसटती छबी. त्या एखाद्या प्राण्याचं केवळ ओझरतं दर्शन घेण्यासाठी इतका अट्टाहास? पण तरीही हौस ना...
बरं, आणि काही काही लोकांना हरणं किंवा हत्ती नुसते दिसून उपयोग नाही.. ऊं!! त्यात काय, हत्ती तर आहे. आम्हाला वाघ बघायला हवा.. अरे, हे काय?
बरं बघितला समजा वाघ, पुढे काय? काय करतो आपण त्याचं नंतर?

आणि प्राणी बघायचे म्हणजे नक्की काय? हत्ती गवत खातो कसा, हत्तीचे दात, सोंड किती कौतुकाने न्याहाळतो आपण. हत्तीला याबद्दल काय वाटत असेल? कधी कधी असं वाटतं एखादा हत्ती चिडून सोंड वेळावून अचानक म्हणेल, काय शिंची कटकट आहे, किती गोंधळ घालतायत ही माणसं, निवांतपणे गवत पण खाऊ देत नाहीत. एक सोंडेने रपाटा हाणला म्हणजे कळेल बेट्यांना.
वाघोबाची तर गोष्टच वेगळी. त्याच्या चालण्यावरही लोक फिदा होतात. पण समजा, नसली एखाद्या वाघाची चाल ऐटदार, म्हणून काय मग त्याच्या ’वाघोबा’ पणाला बाधा येते काय? त्याला नसेल का असं वाटत - साली माणसाची जातच विचित्र ! सुखाने शिकार करु, चार घास खाउन मस्तपैकी डरकाळी फोडून निवांतपणे ताणून द्यावं म्हटलं तर ते नाही. उठसूट आपले माझ्या मागे. जरा प्रायव्हसी म्हणून मिळू देईनात की...

खरंच कल्पना करा हं, आपण जेवताना आपण घास कसा तोडतो, किती मोठा घास घेतो, कसा तोंडात घालतो, किती मोठा ’आ’ करतो, किती पटकन गिळतो वगैरे वगैरे गोष्टी सदैव कुणीतरी निरखून निरखून बघू लागलं तर ? आपण चालतो कसं, बसतो कसं, किती डौलदार चाल आहे किंवा किती शेळपट वाटतोय इत्यादी इत्यादी कमेंट्स जर उठसूट आपल्यावर कुणी करु लागलं तर कसं बरं वाटेल आपल्याला?


प्राण्यांना नसेल का हो असं काही वाटत?

Friday, June 25, 2010

भूतकाळात डोकावताना...२

दादाआजोबा आणि माईआजी

दादाआजोबांबद्दल मी जेव्हाजेव्हा विचार करते तेव्हातेव्हा त्यांची शांत मूर्तीच डोळ्यासमोर येते. मी जेव्हढं त्यांना बघितलंय तेव्हढ्या सगळ्या आठवणींत त्यांची रागावलेली मुद्रा तर सोडाच पण कुणाबद्दल उणादुणा शब्द उच्चारल्याची साधी खूणही सापडत नाही. आजोबांची पूर्ण भगवद्गीता पाठ होती. ते बर्‍याचदा पूर्ण गीता वाचायचे. दुपारच्या शांत वेळी त्यांच गीतापठण चालू असताना आम्हाला त्याना डिस्टर्ब न करण्याचा इशारा मिळत असे. अर्थात त्यांना डिस्टर्ब केलं तरी ते कही ओरडाबिरडायचे नाहीत, पण मुळात त्याना बघून आम्हाला तशी इच्छाही नाही व्हायची. हृदयविकाराचा झटका येउन गेल्यानंतर त्यांनी स्वतःला जे maintain  केलं होतं ते खरोखर दाद देण्यासारखं होतं. वेळच्यावेळी औषधं घेणं, कुठली औषधं संपली आहेत, कुठली आणायची आहेत त्याची यादी करुन ती आणणं/आणवणं हे अगदी शिस्तीत आणि वेळच्या वेळी व्हायचं. कुणीही न सांगता सवरता!
त्यांच्या अतिशांत वृत्तीमुळे माईआजीचा मात्र भडका उडायचा कधीकधी!! माईआजी माझ्या आईची सावत्र आई. खरं तर हा शब्द उच्चारताना मला इतका त्रास होतोय की कुणी कल्पनाही नाही करु शकणार. ही गोष्ट मला फार उशीरा म्हणजे दहावीला गेल्यावर समजली. आईची आई गेली तेव्हा समस्त मामा-मावशी मंडळी लहान होती म्हणून माझ्या पणजोबांनी आजोबांना दुसरं लग्न करायला लावलं असं नंतर आईशी बोलताना समजलं. अर्थात त्याकाळी दुसर लग्न ही काही फार मोठी बाब नव्हती. याबद्दल इथे लिहीण्याचं खरं तर काहीच कारण नाही.पण मला अतिशय अभिमान वाटतो या गोष्टीचा की तो so called ’सावत्रपणा’ कुठल्याच बाबतीत अजिबात आड आला नाही. कधीच नाही.त्यामुळे जेव्हाजेव्हा मी या गोष्टीचा विचार करते तेव्हातेव्हा माझ्या मनातला तिच्याबद्दलचा आदर दुप्पट वाढतो.
किंबहुना मी माझ्या सगळ्या मामांमधे शैलेश-प्रसाद मामांच्या जास्त जवळ आहे. शनवारात राहत असेपर्यंत ठीक होतं, पण कोथरूडला शिफ़्ट झाल्यावर गावात खरेदीबिरेदीसठी जाताना आजीला मामी किंवा माझी आई सोबत लागायचीच. आजीच्या हातची शेवयाची खीर आणि चैत्रागौरीच्या वेळची कैरीची आंबट डाळ-पन्हं हे पदार्थ माझ्या विशेष आवडीचे होते.
आजी छोट्या छोट्या गोष्टींचंही कौतुक करायची. एकदा तर धुतलेलं धुणं मी नीट दांडीवर वाळत टाकल्यामुळे तिने मला खूश होऊन शाबासकी दिली होती. आदित्यने जेव्हा पहिल्या पगारातून त्यांना cordless phone घेउन दिला होत तेव्हा तिनं तो सगळ्यांना मोठ्या कौतुकाने दाखवला होता. नातवाचा अभिमान तिच्या डोळ्यातून ओसंडून वाहत होता.
तेव्हाच मीही ठरवलं होतं की मी पण नोकरी लागली त्यांच्या्साठी नक्की काहीतरी घेईन. या सार्‍या गोष्टींना आता फार उशीर झालाय खरं तर. काळाने ती संधी माझ्याकडून कढून घेतलीये. काळाचा तरी काय दोष म्हणा, माझ्या अजागळ पणामुळेच झालंय हे सगळं.
बंगलोरला आल्यावर दोनदा पुण्याला जाणं झालं. अनिरुद्धच्या बारशाच्या वेळी आजोबांना चालणं शक्य नसल्याने फक्त आजीच आली होती.नंतर जेव्हा फ़ेब्रुवारीत गेले तेव्हा गेल्याबरोबर आजोबांच्या जाण्याचा धक्का सहन करावा लागला होता. आजोबांचं शेवटचं दर्शन केवळ एका दिवसाने चुकलं! आणि आता चार महिन्यांतच आजीही गेली. तिच अखेरचं दर्शनच काय तर दहाव्यालाही मी तिकडे नसणार. मी इतकी कमनशिबी कशी???

Sunday, June 20, 2010

भूतकाळात डोकावताना... १

काय लिहू आणि कुठून सुरुवात करु तेच समजत नाहिये. आज माईआजी गेली. गेल्या चार महिन्यातली ही दुसरी घटना आणि गेल्या दोन वर्षातली सहावी. मोत्याची माळ तुटून एक एक करत मोती गळावेत तसतसे एक एक करुन सगळे गेले. आजी आजोबांच्या त्या पूर्ण पिढीचं अस्तित्व आता संपलय. इतक्या सार्‍या घटना इतक्या कमी काळात घडल्या आहेत, की आता डोळ्यातले अश्रूसुद्धा बंड करून उठलेत. मन मात्र प्रत्येकवेळी तितकंच सैरभैर होतं. आजही तसंच झालंय. सगळ्यांच्या आठवणी मनात दाटून आल्या आहेत. त्या आठवणींचे मोती मी वेचण्याच प्रयत्न करतेय.
खरं तर कुठल्याच आजी आजोबांची मी ’अगदी लाडाची’ वगैरे अजिबातच नव्हते. अनेक नातवंडांपैकी मीही एक. पण आईचे काका काकू-ज्यांना मी काकाआजोबा आणि काकूआजी म्हणायचे, आईचे आई-वडिल म्हणजे माईआजी-दादाआजोबा आणि बाबांचे आई-वडिल -केंदूरचे आजी आजोबा यांच्याबद्दलच्या कितीतरी आठवणींनी कितीतरी वेळापासून माझ्या मनात फेर धरलाय.


काकाआजोबा आणि काकूआजी 


माझ्या शाळेपासून माझं आजोळ खूप जवळ होतं. शाळा सुटली की मी तिकडे जायचे. आई तिथे माझी वाट बघत थांबलेली असायची.
मग काकूआजी कधी थालीपीठ तर कधी साखरांबा-पोळी द्यायची. दुपारच्या वेळेला टी.व्ही वर ’हम पाँच’ आणि ’शांती’ नावाच्या सीरीयल्स लागायच्या. काकाआजोबा या सीरीयल्सचं नेहमीचं गिर्‍हाईक!!! त्यावेळी फार काही कळत नसताना (मुळात कळून घ्यायची आवश्यकता नसताना) मी ती त्यांच्याबरोबर बघायचे. ’हम पाँच’ चं attraction एव्हढ्यासाठी, की त्यात प्रिया तेंडूलकर फोटोतून बोलताना दाखवायचे. त्यावेळी ते फार गंमतशीर वाटे.
काकाआजोबांनी फुलवलेली बाग हा आवडीचा विषय. विशेषतः संध्याकाळच्या झाडांना पाणी घालायच्या वेळेची आम्ही आतुरतेनं वाट बघायचो. नळीने पाणी घालायची पहिल्यांदा संधी मिळावी म्हणून आजोबांकडे वशिला लावायचो. झाडांना पाणी घालणे यापेक्षाही पाणी घालायच्या नळीला पुढे बोट लावून सर्वात लांब फवारा कोणाचा जातो, यातच स्पर्धा असायची. अंगणात सडा घालण्याचं काम आम्ही मोठ्या हौसेनं करायचो. त्या नादात रस्त्यावरची जाणारीयेणारी लोकं भिजायची! तक्रार अर्थातच आजोबांकडे! पण पुनःश्च ’येरे माझ्या मागल्या’ व्हायला कितीसा वेळ लागतो?
जोवर पणजीआजी होती तोवर तिचा एक लिमलेट्च्या, श्रीखंडाच्या गोळ्यांचा खास असा डबा असायचा. खूश झाली, कि ती त्यातनं हळूच एक गोळी काढून हातावर ठेवी. इकडे काकाआजोबांच्या भाजक्या बडिशेपच्या डब्यावरही आमचा डोळा असायचा. त्या खास बडिशेपचे बकाणेच्या बकाणे आम्ही भरायचो.
काम करताना एकीकडे ’श्रीराम जय राम जय जय राम’ चा जप चालायचा. काहीही झालं की त्यांचं- "तो आहे ना वर बसलेला..बघतोय सगळं. तो माझा श्रीरामच मल सगळं देईल!" हे वाक्य कायम असायचं.
काकू आजी गेली तो दिवस अजून आठवतोय मला...गौरी जेवायचा दिवस होता तो. सौभाग्याचं लेणं लेवून -अहेवपणी ती गेली. तिच्या देहावर फुलं टाकून तिचं शेवटचं दर्शन घेताना असं वाटत होतं की जणू तिचा श्वासोच्छ्वास मंदपणे अजूनही चालू आहे. ती थरथर जी मला जाणवत होती ती खरोखरची होती की केवळ माझ्या डोळ्यातल्या पाण्यामुळे मला तसा भास झाला होता हे माझ्यासाठी अजूनही न उलगडलेलं कोडं आहे.
काकूआजी हॉस्पिटलमधे अ‍ॅडमिट असताना एकदा माझ्या आईने तिच्यासाठी तांदुळाची उकड करून नेली होती. त्यातली तिने खाउन झाल्यावर उरलेली उकड मी संपवली होती. त्यानन्तर कित्येकदा आईने उकड केली, पण त्यादिवशीच्या उकडीची चव मला परत कधीच अनुभवायला मिळालेली नाही. आता तर तांदुळाची उकड आणि काकूआजी या दोन्ही आठवणी येताना  सोबत हातात हात घालूनच येतात..........

Saturday, June 12, 2010

मरे एक त्याचा....

मृत्यू, एक कडवट सत्य.
 प्रत्येकाच्या नशिबात लिहिलेलाच
मनुष्य असो वा जनावर, गरीब असो वा श्रीमंत,
सुखी असो वा दुखी, सज्जन वा दुर्जन.
तिथे भेदाभेद कधीच नाही.

उगवलेला सूर्य मावळणार हे जितकं सहज तितकंच..
जन्माला आलेला कधी ना कधी मरणार हेही.
मग तरीही हे सत्य सहज स्वीकारता का नाही येत?
दरवेळेला ते मनाला टोचणी देऊन का जातं?
आपल्या डोळ्यांपुढे कुणीतरी शेवटचे श्वास घेतो आणि तरीही..
तरीही आपण काही म्हणता काहीच नाही करू शकत
ही हतबलता अनुभवणं किती वेदनामय असता!

आपले जीवन पूर्णपणे जगून मग मृत्यू आल्यास एकवेळ हरकत नाही.
पण ज्यावेळी डोळे नीट उघडून जग बघायच्या आधीच मृत्यूला सामोरे जावे लागले तर?

का त्या छोट्या जीवाच्या नशिबी हा सारा खेळ?
अजून पंखसुध्दा फुटले नव्हते त्याला व्यवस्थित 
भरारीची आस असणं दूरच 
दाणापाणी खाण्यासाठी आपली चिमणी चोच उघडावी लागते हेही कळण्याचं वय नव्हतं त्याचं

काय बिघडलं असतं जर ते चिमणं पाखरू जिवंत राहिलं असतं तर?
बघितलं असतं त्यानेही ते निळशार आभाळ.
मारली असती एक स्वच्छंद फेरी उंच आभाळात
केला असता त्याच्या चिमण्या आवाजात गोड किलबिलाट…
खरंच, काही बिघडलं असतं का??

पण नाही.
आणि काळदेखील यावा कसा?
आपल्याच भाऊबंदाच्या रूपाने.
मजा वाटते का मृत्यूला
इतक्या कठोरपणे वागण्यातच?

जिवंत असतानाची त्याची थरथर,
उबेचा हात लागल्यावर थोडी कमी झाली होती..
पण तरीही काळापुढे आपण सारे फिकेच..
त्याच्या थंडावलेल्या शरीराला स्पर्श करताना माझ्याच शरीरावर शहारे उमटले
आणि आठवल्या समर्थांच्या ओळी…

मरे एक त्याचा दुजा शोक वाहे
अकस्मात तोही पुढे जात आहे…

Monday, June 7, 2010

Inspiration

Today I am feeling very good. I wanna do lot of work, want to immerse myself into the deep sea of work, really want to get drawn into it.

In past few days, I have hardly done work (as in with some useful output). I spent my all time in playing, chatting, sleeping, watching movies... Now I am suddenly finding myself uninterested in all those things. I think the reason behind is lack of motivation, lack of interest towards the job I am supposed to do.
I read so many articles / books in those days but hardly any was related to my own area. I don't know why but I don't feel like reading the books related to statistics (its an alert for me... isn't it??) May be it is in my nature. Given a choice, I will never do serious/ study kind of stuff. Though I have tried to change myself so many times, a little distraction is enough to bring me on same old route.


Today morning while sipping my tea, I was observing a mantis on the iron mesh wall of our house. It was constantly trying to climb it up. It started with small steps, wisely utilizing its energy. The picture is still in front of my eyes. I was so amazed and occupied watching it, that I completely forgot to sip my tea ( I realized that when I found myself sipping cold tea after some time)
What gives energy, motivation to that 3-4 cm long with hardly few grams ( or should I say milligrams?) weight to work against the gravitational force resulting due to climbing the wall in 90 degrees? Still, with constant efforts, it climbed that wall successfully.

Why one need to go around looking for the sources of inspiration when it could be there right in front front of our eyes? Why can't little creatures like mantis be an inspiration? It can, surely.

We just need to look around with open eyes.